गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

मुलेच चालवतात मुलांचे वाचनालय !!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे ग्रंथपाल म्हणून काम करणारे विद्यार्थी चि अक्षय दिनकर सांगळे आणि चि बबन रोडे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती सरिता महाजन यांचे वडील श्री ज्ञानचंद महाजन यांनी वाचनालयाची माहिती ऐकून ३ हजार रुपयांची पुस्तके शाळेस भेट दिली. या पुस्तकांचे प्रदर्शन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री ह सि गित्ते, सहशिक्षक श्री चप्पे व सहकारी शिक्षिका भगिनी 
  

गोष्टींची पुस्तके मुलांची कल्पनाशक्ती वाढवतात, त्यांची एकाग्रता वाढवतात, अभ्यासातील गोडी वाढवतात.. अशा अवांतर गोष्टींच्या पुस्तकांमध्ये विविधता असल्याने मुलांना स्वतःच्या गतीने नुसार, आवडीनुसार पुस्तके घेता येतात आणि ज्ञानाची पातळी वाढवता येते. अभ्यासाचीच पुस्तके नीट वाचत नाहीत तर ही कुठली वाचणार असा जर शिक्षक किंवा पालकांचा समज असेल तर तो नक्कीच दूर होतो... मुलांच्या हाती गोष्टींचे पुस्तक देऊन तर पहा !! 

     हुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके 'देण्याघेण्यात खराब होतील' म्हणून दिली जात नाहीत अथवा जी पद्धत या लेखात नमूद केली आहे अशा पद्धतीने खूप कमी शाळांमध्ये विचार केला जातो. विद्यार्थ्यांसाठी असणारा पुस्तकरूपी हा अमूल्य ठेवा काही काळाने वाळवी खातात परंतु विद्यार्थ्यांच्या उपयोगात येत नाही हे दुर्दैव! ग्रंथपाल नसणे आणि शिक्षकांनाही अध्यापनासह इतर अनेक कामे सोपवली जातात, ज्यामुळे गोष्टींची पुस्तके नियमित मुलांना देणे आणि परत घेणे व त्यावर आधारित उपक्रम आयोजित करणे त्यांच्यासाठी अशक्य होऊन जाते. विद्यार्थ्यांच्याच मदतीने वाचनालयाचा उपक्रम सक्रियपणे राबवण्यात आला तर! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे कार्यरत असताना २००८ साली ही गोष्ट सहजच डोक्यात आली आणि सहकारी व मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा केली; पुस्तके हरवण्याच्या भीतीची बाब सोडता सर्वांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमास मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले आणि जणू या अनोख्या बाल वाचनालयाचा जन्म झाला! 



*यशस्वीपणे सांभाळल्या जबाबदाऱ्या!* 
 १ जानेवारी २००८ रोजी बाल वाचनालय मुलांसाठी मुलांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या आणि शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या सोनाली बलवीर आगळे हिने दररोज या वाचनालयातील पुस्तके दुपारी १.३० ते २ या वेळेत मुलांना देण्यास सुरुवात केली. वर्गवार वेळापत्रक ठरविण्यात आले. विद्यार्थ्यांना सात दिवस पुस्तक वाचता येणार होते. प्रत्येक वर्गात शिक्षकांनी मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित केले. पहिल्या वर्षांत इयत्ता ३ री ते ७ वीच्या ४२८ मुलांनी पुस्तके वाचली. शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करून त्यातील एका मंत्र्याला वाचनालयाची जबाबदारी देण्याचे ठरवण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षांत नव्या शालेय मंत्रिमंडळातील मंत्री मनीषा महादेव काळे हिने वाचनालयाचा कारभार हाती घेतला होता. पुढे हिच परंपरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे सुरू राहीली. मागील 14 वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू आहे. पुस्तके कोणत्या दिवशी- कोणामार्फत- कोणत्या वेळेत वाटप करावीत, त्याची नोंद कशी ठेवावी, देवाणघेवाणीचे वेळापत्रक असे उत्तम नियोजन करण्यात आले. ज्या वर्गाचा परिपाठ असतो त्याच दिवशी त्यांना मोठ्या मध्यंतरीत पुस्तके मिळू लागली. सुरुवातीचे काही दिवस सोबत मी बसायचो, नोंद कशी करावी, नावे कशी लिहावीत, विद्यार्थ्यांना ओळीत उभे करणे, त्यांच्या आवडीनुसार पुस्तके निवडण्याची मुभा देणे या गोष्टी संबंधित ग्रंथपाल विद्यार्थ्यास समजावून सांगितल्या.



  *पुस्तक परिचय उपक्रम*
     मुलांना पुस्तकाच्या वाचनाचा फायदा कळावा म्हणून शाळेत दररोजच्या परिपाठात ‘पुस्तक परिचय’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुरुवातीला शिक्षकांनीच पुस्तकांचा परिचय करून दिला. मात्र, नंतर मुलांनी अतिशय चांगल्या, मोजक्या शब्दांत पुस्तकांचा परिचय करून देण्यास सुरुवात केली. मुले पुस्तकांवर चर्चाही करू लागली. वाचलेल्या पुस्तकातील विनोद, गोष्टी, कविता आई-वडील, मित्रांना सांगण्यासाठी शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके वाचण्याची विद्यार्थ्यांना चांगलीच गोडी लागली. सात दिवस पुस्तक सोबत असल्याने घरातील ज्या सदस्यांना हे पुस्तक वाचण्याची आवड आहे ते ही अशी पुस्तके वाचू लागली. गोष्टी वाचत असताना मुले अभ्यासातील पुस्तकापेक्षा अधिक एकाग्र होतात, त्यांची एकाग्र शक्ती वाढते. समजून घेऊन वाचण्याची वृत्ती वाढल्याने आकलन शक्ती वाढते. याच मुलांची नंतर अभ्यासातील प्रगतीही शिक्षकांना-पालकांना दिसते. स्वतःची मत कसे मांडावे, वाक्यांची सोपी रचना कशी असावी अशा भाषेच्या कौशल्याच्या गोष्टीही मुले गोष्टीच्या पुस्तकातून सहजरीत्या शिकतात.


 
 *शतकवीर वाचक*
     बाल वाचनालय सुरु झाल्यानंतर आठ महिन्यांतच कु सुनीता हनुमंत काळे हिने शंभर पुस्तकांचे वाचन केले होते! तिचा शतकवीर वाचक म्हणून 'श्यामची आई' हे पुस्तक देऊन पुस्तक प्रदर्शनाच्या उदघाटनास आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. मुलांनी गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन आवडीने करण्यास सुरुवात केली होती आणि वाचलेल्या पुस्तकांची नोंदी आपल्या वहीत ते ठेवत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहारी आणि त्यानंतरची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथेही विद्यार्थ्यांना स्वतंत्र कार्ड अशा नोंदी करण्यासाठी पुरवण्यात आले आहेत. पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव आणि वाचल्याची तारीख अशा सोप्या नोंदी यावर आहेत. सहजपणे आपण वाचलेल्या पुस्तकाविषयी गप्पा मारल्या तर मुले काही बाबी सांगत असतात. दिवाळी आणि उन्हाळी च्या सुट्ट्यातही मुलांना पुस्तके वाचायला हवी होती, या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी शाळेतील ग्रंथपाल असलेल्या विद्यार्थ्याकडे ही पुस्तके ठेवण्यात येवू लागली आणि सुट्टीच्या काळातही विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचली. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उदघाटन करताना मराठवाडा साहित्य परिषद शाखा परळीचे सचिव प्रा राजकुमार येल्लावाड, केंद्रप्रमुख प्रतिनिधी श्री दिलीप तलवारे सर, मुख्याध्यापक श्री निलेवाड, सहशिक्षक श्री निकते सर 

  
*पुस्तकांची संख्या वाढू लागली* 

        आठ दिवस पुस्तक विद्यार्थ्यांच्या घरी राहत असल्याने त्याच्या घरचेही पुस्तके वाचू लागले. निबंध लिहायला, किस्से सांगायला आणि ज्ञानाची शान मारायला पुस्तक वाचनाचा फायदा मुलांना होऊ लागला. काही विद्यार्थी पुस्तक लवकर वाचून पुन्हा मागू लागली; मग ज्यांना एक-दोन दिवसाआड पुस्तक हवे असेल त्याला रुपया, दोन रुपये महिना फी आकारली होती आणि जमलेल्या निधीतून नवी पुस्तके खरेदी केली गेली. मात्र, आठ दिवसांनी पुस्तक घेणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. या शुल्कातून वाचनालयातील पुस्तकांत अधिक भर पडली. स्वतःच्या वाढदिवसाला शाळेत इतर काही देण्यापेक्षा गोष्टीचे पुस्तके द्यावीत असे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला एक तरी पुस्तक द्यायला सुरुवात केली यामुळेही पुस्तकांची संख्या वाढली. बाल वाचनालय संदर्भातली संकल्पना गावातील प्रतिष्ठित शिक्षण प्रेमी नागरिकांना सांगितल्यानंतर त्यांच्यापैकी अनेकांनी पाचशे रुपये, हजार रुपये याप्रमाणे या वाचनालयास सप्रेम भेट दिले त्यातूनही पुस्तकांची खरेदी करण्यात आली. शाळेतील शिक्षिका श्रीमती सरिता महाजन यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक श्री ज्ञानचंद महाजन यांनी तीन हजार रुपयांची पुस्तके या उपक्रमाबद्दल माहिती ऐकून शाळेस सप्रेम भेट दिली. अशा पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले व विद्यार्थ्यांना नव्या पुस्तकांची वाचन गोडी लावण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी येथील विद्यार्थिनीच्या समूहाने एका सामूहिक नृत्यांमध्ये अडीच हजार रुपयांचे बक्षीस मिळवले, ही रक्कम त्यांनी शालेय बाल वाचनालयास सुपूर्द करून नवी पुस्तके खरेदी केली. मुंबई येथील नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्याकडून ही पुस्तके मागवण्यात आली होती. शाळेच्या बालवाचनालयाची वेगळी बातमी ज्या शिक्षण प्रेमी नागरिकांच्या कानावर पडत होती, ते शाळेला काही ना काही मदत करत होते. एक-दोन पालकांनी त्यांच्याकडे असणारी अनेक जुनी परंतु उपयुक्त पुस्तके शाळेला सप्रेम भेट दिली. यातूनही पुस्तकांची संख्या वाढली. 



 *सहस्त्र पुस्तक वाचन समारंभ आणि पुस्तक प्रदर्शन* 
      शाळेतील पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदीचा आकडा आता एक हजाराच्या जवळ आलेला होता, ग्रंथपाल असणाऱ्या विद्यार्थ्याने सुचवले की सहस्त्रवाचक समारंभ करू या! यानिमित्ताने टोकवाडी गावातील शिक्षण प्रेमी डॉक्टर राजाराम मुंडे यांनी शाळेला एक हजार रुपयाची पुस्तके भेट दिली, त्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि उत्कृष्ट वाचक विद्यार्थ्यांचे सत्कार, त्याचबरोबर मनोगते, अशा रीतीने हा समारंभ पार पडला.



  *पुस्तकांची काळजी आपणच घेऊ!* 

       पुस्तकांच्या देवाण-घेवाणीमध्ये त्यांचे मुखपृष्ठ कधी खराब होते, तर कधी त्यांची बांधणी निसटते, हे होणे अपेक्षितच होते म्हणून वाचनालय बंद करणे हे मात्र योग्य नाही... विद्यार्थ्यांच्याच मदतीने आवश्यक असणाऱ्या पुस्तकांची काळजी घेण्यात आली. आवश्यक असणाऱ्या पुस्तकांना कव्हर बसवण्यात आले, पिना मारण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांनी त्यावर पुस्तकांची नावे छान प्रकारे टाकली. आपण ज्या वस्तू वापरत असतो त्यांची काळजी आपणच घ्यायची असते हा संदेशही यातून मुलांना दिला गेला. "हे करील कोण,  ते करील कोण, आपले आपणच, दुसरे कोण?" आपल्या समस्या आपणच सोडवायच्या असतात. ग्रंथपाल नाही, पुस्तके खराब होतील, त्यांची देवाण-घेवाण कोणी करायची? अशा अनेक समस्यांना प्रश्नांना बाल-वाचनालय समर्थपणे चालवून शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर शोधले आहे.

*शाळेच्या बाहेरचे पुस्तकांसाठी उपक्रम*

 १) स्थानिक दैनिक मराठवाडा साथी मध्ये दार रविवारी मुलांसाठी खास पुरवणी संपादक म्हणून काम केले आणि दार रविवारी १९९६ ते २०१५ कालावधीत हजारो मुलांना गोष्टींचे पुस्तके बक्षिस स्वरुपात देण्यात आली. 

२) उन्हाळयाच्या सुट्टीत स्वत:च्या घरी असलेल्या पुस्तकांचा वाचनाचा लाभ परिसरात राहत असलेल्या मुलांना दिला. 

३) नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे (विशेषतः विद्यार्थ्यांसाठी) वतीने परळी वैजनाथ येथे घेण्यात प्रमुख भूमिका घेतली. गट साधन केंद्र परळी वैजनाथ, दि इंडिया सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे पुस्तक प्रदर्शन जिल्हा परिषद कन्या माध्यमिक शाळा परळी वैजनाथ येथे ३ दिवसांसाठी भरवण्यात आले होते. परळी शहरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पुस्तकप्रेमींनी भेट देऊन पुस्तके खरेदी केली. जवळपास १ लाख रुपयांची पुस्तके विक्री झाल्याने मुंबई येथून संचालक यांचे विशेष कौतुक करणारे पत्रही मला आले होते. 

४) नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे फिरते प्रदर्शन घेऊन आलेल्या गाडीला परळी शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला.  

चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके, 
सहशिक्षक, परळी वैजनाथ 
(9325063512)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थी वाचनालयाची जबाबदारी सांभाळत पुस्तक वाचनाचा आनंद घेत असताना

दिवाळी/उन्हाळी सुट्टीत माझ्या घरी गोष्टीची पुस्तके वाचण्यास येणारी परिसरातील मुले
सामूहिक नृत्य स्पर्धेत मिळालेल्या नगदी बक्षिसाच्या रक्कमेचे शाळेच्या वाचनालयास पुस्तके देऊन मुलींनी पुस्तकांचे महत्व अधोरेखित केले. प्राथमिक शाळा दादाहरी वडगाव येथे पुस्तके स्विकारताना मुख्याध्यापक श्री राजले 
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे परळीत फिरते प्रदर्शन 
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे परळीत फिरते प्रदर्शन 



गोष्टीचे पुस्तक वाचल्यानंतर त्याची नोंद ठेवलेल्या व सर्वाधिक पुस्तके वाचल्याचे बक्षीस जिंकलेल्या प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थीनी.. ही पुस्तके त्यांनी दिवाळी सुट्टीत वाचली.



 
 नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे परळीत भरलेले प्रदर्शन. प्रदर्शनाचे उदघाटन करताना नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे परळीतील लेखक, मराठवाड्याचे साने गुरुजी आदरणीय श्री आबासाहेब वाघमारे व दि इंडिया सिमेंट कंपनीचे तसेच नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचे पदाधिकारी.  
            
२०१३ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे भरलेले पुस्तक प्रदर्शन 
२०१३ साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे भरलेले पुस्तक प्रदर्शन 
आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून शाळेला पुस्तके देताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी येथील विद्यार्थिनी कुमारी प्राची शिंदे व तिचे आजोबा 
वापरून खराब झालेल्या पुस्तकांची आवरणे नव्याने बसवून त्यावर पुस्तकांची टाकलेली नावे व पुस्तकांना दिले नवे रूप 
वापरून खराब झालेल्या पुस्तकांची आवरणे नव्याने बसवून त्यावर पुस्तकांची टाकलेली नावे व पुस्तकांना दिले नवे रूप 
पुस्तक प्रदर्शनात मांडलेली नवी-जुनी पुस्तके पाहताना विद्यार्थी 
नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या पुस्तकांचे परळीत भरलेले प्रदर्शन 






 





३ टिप्पण्या:

  1. खुप छान सरजी, उपक्रमाची छान मांडणी केली आहे 👌👌👍👍💐💐🙏😊

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच हे सर्व वाचल्यानंतर ५ वी ते ७ वी पर्यंत चे दिवस आठवतात. मुलांच्या वाचनालयाचा फायदा त्यावेळी तर झालाच परंतु त्यामूळे अजूनही पुस्तकं वाचायची सवय गेलेली नाही. समोर येईल ते पुस्तक वाचायचं हे तेव्हापासूनच ठरलं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी आणि तेथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अनमोल अस शिक्षण तर दिलंच त्यासोबतच आयुष्य भर पुरेल इतकं मार्गदर्शन सुद्धा केले. तेथील झालेल्या प्रत्येक उपक्रमा मुळे विद्यार्थी घडले आहेत. हे सर्व आपण जपलं आणि आठवून दिलं त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Welcome अक्षय, तू या उपक्रमात सहभागी होतास म्हणून तुझी प्रतिक्रिया वाचून आनंद झाला

      हटवा