शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

श्री नावकेकर सर : या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे प्रेमळ शिक्षक

 

          शाळेमध्ये असताना मुलांमध्ये रममाण होणारे आणि शाळा नसताना निसर्गाच्या सहवासात हरवून जाणारे अशी ज्यांची ओळख सांगता येईल ते श्री नावकेकर संभाजी भाऊराव हे 31 ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्त झाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये सहशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द विद्यार्थीप्रिय, सहकारीप्रिय आणि पालकप्रिय अशी होती. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे त्यांच्यासोबत 2005 ते 2012 या कालावधीमध्ये सोबत काम करण्याचा आनंद घेता आला. 
शाळेची गुणवत्ता वाढावी, भौतिक, शैक्षणिक विकास व्हावा यासाठी त्यांची नेहमी धडपड असायची. काही कालावधीसाठी प्रभारी मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. 


प्रभारी मुख्याध्यापक असताना शाळेच्या मैदानाचा काही भाग त्यांनी उत्तम दर्जाची हराळी खरेदी करून गार्डन म्हणून विकसित केला होता. शाळेचे हे मागील मैदान प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अतिशय घाणरेडे झालेले असल्याचे जून मध्ये शाळा सुरु होताच लक्षात यायचे. श्री नावकेकर सर आणि टीमने अक्षरश: नांगर फिरवून हे मैदान बागेसाठी योग्य केले होते.  इथे झाडांना पाणी मिळावे म्हणून गावासाठी बंद असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतून स्वखर्चाने मोटर टाकून शाळेपर्यंत पाईपलाईनची सुविधाही त्यांनी केली होती. हिरवा गालिचा पसरलेला हा मैदानाचा भाग आणि त्यात पाण्याचे छोटासे कारंजे शाळेचा भाग सुशोभित करत होते. 


मुलांना आनंदाने शिकता यावं यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न विशेष दखल घेण्याजोगे आहेत. झाडे लावण्यापूर्वी शाळेला साधे कंपाउंड होते म्हणून त्यांनी तारेचे कंपाउंड करून घेतले. गावचे त्याकाळचे उपसरपंच श्री बालाजी प्रभू मुंडे यांना भेटल्यानंतर त्यांनी मजबूत असे कंपाउंडही तयार करून दिले होते. 


कंपाउंडची सुरक्षितता आणि खळाळते पाणी यामुळे शाळेचे मैदान वृक्षांनी नटले होते. लहान मध्यंतरात किंवा मोठ्या मध्यांतरात सरांना वेळ मिळाला की ते फक्त झाडांच्या भोवतीच असायचे.
वर्गातून बाहेर येताना खडूमुळे पांढरे झालेले हात तर वर्गात जाताना झाडांभोवती कुंपण करताना चिखलाने भरलेले हात ते स्वच्छ करताना बहुतेकदा दिसत. 


त्यांनी जेव्हा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार हाती घेतला तेव्हा शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. सरांनी विनंती केल्यानंतर बांधकाम विभागाने एक मोठा पाईप क्रेनच्या साह्याने शाळेत दिला  आणि सार्वजनिक बोअरचे पाणी पाईपद्वारे यात सोडण्यात येऊन पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची ही सोय करण्यासाठी सरांनी व्यक्तिशः खूप मेहनत घेतली. 


जिथे जून मध्ये शाळा उघडल्यानंतर कुलूप तोडलेले असायचे अथवा कधीकधी वर्गात घाण असलेली दिसून यायची त्याच गावचे ग्रामस्थ आता शाळेशी प्रेमाने जोडले गेले होते आणि त्यात श्री नावकेकर सरांची भूमिका मोलाची होती. नावकेकर सर आणि टीम मेहनत घेत असल्याचे पाहून गावकरीही पुढे आले. मदत मिळत गेली, ऑफिसची फरशी बदलण्यात आली, प्रत्येक वर्गामध्ये फॅन बसवण्यात आले, वर्गांची रंगरंगोटी करण्यात आली. आवश्यक तिथे दुरुस्ती केली गेली. शाळेची लाईट फिटिंग होताना सरांचा रात्रीचाही वेळ शाळेत जात होता. 


विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होण्यासाठी विविध स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलने, त्याचबरोबर शैक्षणिक सहलींचे आयोजनही नावकेकर सरांच्या काळात करण्यात आले होते. 


विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांची तळमळ ही अतिशय मोलाची होती म्हणूनच विद्यार्थ्यांशी त्यांचे नाते अतिशय चांगल्या प्रकारचे होते. आजही त्यांचे माजी विद्यार्थी अतिशय आदरणीय त्यांच्याशी बोलतात, त्यांची चौकशी करतात. वर्गात असताना जणू या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे श्री नावकेकर सर आज पुन्हा शाळेत दिसणार नसले तरी निसर्ग शाळेत ते तितकेच रममाण होतील यात शंका नाही. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर टोकवाडी येथे त्यांचा सेवेचा शेवटचा भाग गेला. या वस्ती शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्यापासून ते गुणवत्ता वाढीसाठीचे त्यांचे प्रयत्न असेच अविरत सुरु होते. शाळा छोटी असूनही स्नेह संमेलन, विविध स्पर्धा, आंतर शालेय स्पर्धेत भाग घेतला जायचा. 


त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे व निरोगी जावो अशी मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या व सहकाऱ्यांच्या वतीने देतो. 
- चंद्रशेखर फुटके, परळी 

















२ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्दांकन...!! सर्वानाच श्री नावकेकर सरांचा कार्याचा अभिमान आहे.....त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा...🌹🙏

    उत्तर द्याहटवा