मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३
सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३
हा प्रवास असाच आनंदाचा होवो!
हा प्रवास असाच आनंदाचा होवो!
शिक्षक म्हणून नोकरीस लागून बाल गोपाळांच्या सहवासामध्ये किती लवकर 30 वर्षे झाली याचा मला विश्वास वाटत नाही.... असे वाटते की कालपरवाच तर मी शिक्षक म्हणून नोकरीस लागलो आहे!
पहिल्या दिवशी जो उत्साह विद्यार्थ्यांसमोर जात असताना असायचा तो आजही कायम आहे..... माझ्या विद्यार्थ्यांना नवे उपक्रम कसे देता येतील, नव्या पद्धतीने त्यांच्याकडून अभ्यास करून कसा घेता येईल, कुठे काही दिसले तर हे माझ्या विद्यार्थ्यांसाठी कशाप्रकारे उपयोगात आणता येईल, कुठे चांगली शाळा-उपक्रमशील शिक्षक दिसले की त्यांच्याकडून मला काय शिकता येईल हे आजही तीस वर्षानंतर मला वाटते... हे असं वाटणं आणि हे असं कायम व्यस्त राहणं यात मला आनंद मिळतो आणि ते माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत राहो हीच आजच्या दिवशी मी भगवंताकडे प्रार्थना करेल....
शिक्षक सेवेबद्दल कधी कोणी वाईट बोललं की थोडीशी निराशा येते; पण ती फार काळ टिकत नाही. कुठल्यातरी माध्यमातून कुणीतरी अमुक तमुक आमच्यावर तोंडसुख घेतो... पण खरं सांगतो, एकदा मुलं समोर आली की ती नैराश्यता, ते सगळं निगेटिव्ह ऐकलेलं पार विसरून जातो! अगदी पहिल्या दिवशीच्या उत्साहानेच दर दिवशी शिकवतो! आणि हो, जसे निराशाजनक कोणीतरी बोलते तसेच कधी कधी कोणी कोणी हरभऱ्याच्या झाडावरही नेऊन ठेवते! कोणी माझे खूप कौतुक केले त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच माझ्या नेहमीच्या भूमिकेत मी माझे अध्यापन करण्याचा प्रयत्न करत असतो...... भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की हे ही माझ्या सेवेच्या शेवटपर्यंत टिकू दे!
तीस वर्षांच्या सेवेमध्ये बरेचसे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सेवेत गुंतले असतील आणि अपेक्षा आहे की हे सर्वजण ती सेवा प्रामाणिकपणे करत असतील..... इमानी इतबारे जीवन व्यतीत करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षकाला अभिमान वाटतच असतो.; परंतु नकळत या कार्यात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि एखादा विद्यार्थी दुखावला गेला असेल तर मी मनःपूर्वक क्षमा मागतो!
तीस वर्षांच्या या सेवा कालामध्ये अनेक मार्गदर्शक लाभले, ज्या ज्या गावात सेवा दिली त्या गावातील गावकऱ्यांचे सहकार्य लाभले, वेगवेगळ्या शाळांमधील माझ्या सहकारी बांधवांमुळे माझे शाळेतले दिवस अतिशय आनंदाचे गेले, वेगवेगळ्या उपक्रमात त्यांच्यासोबत काम करताना उत्तम अनुभव मिळाले आणि मी समृद्ध होत गेलो..... म्हणून त्या सर्वांचेही मला आभार मानावेसे वाटतात..... Thank You Very Much!
गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३
अर्णव बुक्कापाटीलचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे
सिंगापूर येथे राहत असलेल्या परळी वैजनाथ तालुक्यातील गाढे पिंपळगावच्या ज्योती थोंटेच्या मुलाने सिंगापूरच्या सर्वोत्कृष्ट शाळेत आपल्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळवला असून 160 विद्यार्थी क्षमता असलेल्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती.परळी वैजनाथ जिल्हा बीड तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थीनी असलेली ज्योती वैजनाथअप्पा थोंटे ही सध्या इंजिनियर म्हणून सिंगापूर येथे सेवेस आहे. तिचा मुलगा अर्णव बुक्कापाटील हा सध्या शालेय शिक्षण घेत आहे. सिंगापूर येथे गणित व विज्ञान विषयांसाठी खास सुप्रसिद्ध असलेल्या NUS High School of Math and Science, Singapore शाळेत आपला प्रवेश व्हावा हे अर्णवचे स्वप्न होते. त्याने यासाठी खास अभ्यास केला. यासाठी झालेल्या दुसऱ्या राऊंड मध्येच त्याचा प्रवेश निश्चित करण्यात आला. वास्तविक पाहता या शाळेत तिसऱ्या राऊंड मध्ये मुलाखत घेण्यात येऊन मगच प्रवेश निश्चित करण्यात येत असतो. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी घेण्यासाठी अर्णव जणू सज्ज झाला आहे. आपले मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी लागते याचे आदर्श उदाहरण अर्णवने मुलांसमोर ठेवले आहे.
आपल्या आवडत्या विषयाची फक्त अभ्यासाला दिलेली पुस्तके वाचून अर्णव थांबत नाही तर त्या संदर्भातील वाचनालयात असणारी पुस्तके वाचन करणे ही त्याची खास आवडीची गोष्ट आहे. त्याची ही सवय अगदी लहान असल्यापासून आहे. खगोल विषयातील त्याचे ज्ञान अचंबित करणारे आहे. कोरोना काळात PDSE (Platform for Development of Spoken English) या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुलांना इंग्रजीतून संवाद करण्यासाठी त्याची मुलाखत घेण्यात आली होती त्यावेळी त्याच्या उत्तरांनी मुले प्रभावित झाली होती. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अर्णव अतिशय अप्रतिम पद्धतीने देत होता. अर्णव व त्याच्या आई वडिलांचे कौतुक करताना आम्हाला नक्कीच आनंद होत आहे.
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
असे लिहा साहित्यसम्राट अण्णांचे यॊग्य पद्धतीने नाव !
साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव अनेक ठिकाणी चुकीचे लिहिलेले दिसते. "अण्णा" हे त्यांना मित्रांनी प्रेमाने दिलेले नाव... त्यांचे खरे नाव तुकाराम. वडिलांचे नाव भाऊराव आणि आडनाव साठे. काही ठिकाणी तुम्ही पाहता की लोक "अण्णाभाऊ साठे" असे लिहितात. असे लिहिणे चुकीचे होईल.
आपण जर "अण्णा भाऊ साठे" असे वेगवेगळे नाव लिहिले तर पहिले नाव आदरणीय श्री तुकाराम यांचे टोपण नाव, दुसरे त्यांच्या वडिलांचे नाव तर तिसरे आडनाव होईल. म्हणून या तीनही नावांच्या मध्ये अंतर असणे आवश्यक आहे. यापुढे ही काळजी आपण घ्यायला हवी. आदरणीय अण्णांचे पूर्ण नाव श्री तुकाराम भाऊराव साठे (अण्णा भाऊराव साठे) असे लक्षात ठेवायला हवे.
शुक्रवार, २८ जुलै, २०२३
नाते 'अधिक' दृढ करण्याचा 'मास'! अधिकमास!
मानवी नाते हे मनाच्या व्यवहारावर अधिक अवलंबून आहेत असे मला वाटते, रक्ताच्या नात्यापासून ते मानलेल्या, जोडलेल्या नात्यांना अधिक चांगल्या पद्धतीने जोडण्यासाठी मन अधिक प्रसन्न असायला हवं. हिंदू संस्कृतीत त्यामुळेच सणावारांची गर्दी आहे. सणांच्या दिवशी मन प्रसन्न ठेवलं पाहिजे, आनंदाने वागलं पाहिजे हे आपले पूर्वज आपल्याला सांगत आलेले आहेत.
'अधिकमास' ज्याला बरेच जण 'धोंड्याचा महिना' असे म्हणतात तो सुद्धा आपल्याला तीन वर्षानंतर एकदा मिळणारा अधिकचा मिळालेला एक सण आहे, म्हणजेच आपण 'अधिकचा आनंद' या दिवसांमध्ये साजरा करायला हवा. या महिन्यात आपण आपल्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांना अधिक दृढ करायला हवे.बऱ्याचदा आपल्याशी जोडल्या गेलेल्या नात्यांमध्ये काही कारणामुळे तणाव निर्माण झालेला असतो. हा तणाव तीन वर्षापेक्षा अधिक काळ चालू नये म्हणूनही कदाचित ही संधी आपल्याला देण्यात आलेली असावी

विशेषत: जावई आणि सासू - सासरे, सासरकडील मंडळी या नात्यांमध्ये तणाव अधिक येतात कारण हे नाते अधिक जवळचे असते; पण काहीही झाले तरी यातला तणाव हा तात्पुरताच असावा आणि पुन्हा नव्या सकारात्मक विचाराने हे नातं जोडलं जावं. मनातली जळमटी दूर करण्यासाठी तशा हिंदू संस्कृतीमध्ये अनेक संधी दिल्या गेलेल्या आहेत, त्यातील ही एक संधीच आहे असे समजून आपण आपलं नातं जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आणि जी नाती पूर्वीच अतिशय सकारात्मक रीतीने चालू आहेत त्यांना अधिकच दृढ करण्याचा हा सण आहे असे समजावे.
या मनोगताच्या सुरुवातीला मी असे म्हटले आहे की, मानवी नाते हे मनाच्या व्यवहारावर अधिक अवलंबून आहे, त्याचा अर्थ असाही घ्यायला हरकत नाही की आपल्याला जमेल तेवढे, झेपेल तेवढे खर्च करून हा अधिकमास साजरा करण्याचा प्रयत्न सासरवाडीकडील मंडळींनी करावा तर जावईबापूंनी आपल्या सासऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन जे दिले आहे ते 'अधिक' चांगले आहे असे समजून हा अधिकमास साजरा करावा!

मंगळवार, १८ जुलै, २०२३
सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी सुंदर हस्ताक्षर व इंग्रजी सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून दुसऱ्या व चौथ्या शनिवारी शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे.
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत.
शुक्रवार, ५ मे, २०२३
सोमवार, १ मे, २०२३
शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने सहा विद्यार्थ्यांना दिला शाळारत्न पुरस्कार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील उपक्रम
![]() |
.jpeg)
परळी, दि
येथून जवळच असलेल्या मिरवट केंद्रातील कासारवाडी जिल्हा परिषद शाळेत शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. वर्षभरातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. आज महाराष्ट्र दिनी मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते सहा विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्कॉलरशिप नवोदय तसेच विशेष अशा अभ्यासक्रमावर आधारित शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दर पंधरा दिवसाला वेगवेगळ्या स्पर्धांचा आयोजन केले जाते. या स्पर्धा दोन गटांमध्ये घेतल्या जातात. शालेय मंत्रिमंडळाचे स्पर्धा मंत्री या उपक्रमाचे रेकॉर्ड ठेवतात. शालेय मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य या स्पर्धेचे व्यवस्थित आयोजन व नियोजन करतात. वर्षभरातील स्पर्धांच्या आधारे शाळारत्न हा पुरस्कार दिला जातो.
आज महाराष्ट्र दिनी गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, ग्रामसेवक श्री नागरगोजे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते, पोलिस पाटील श्री बाबुराव गुट्टे, श्री रामकृष्ण गुट्टे, श्री ज्ञानेश्वर गुट्टे, श्री महादू गुट्टे, श्री जयदीप गुट्टे, श्री अर्जुन दहिफळे, श्री सोपान गुट्टे, श्री अरुण खांडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता सहावी ते आठवी गटातून कु अमृता सोमनाथ गुट्टे, कु अंजली रामकिशन शेप, कु राधा अनंत गुट्टे तसेच तिसरी -चौथी गटातून कु समृद्धी सोमनाथ गुट्टे व कु पूनम बालासाहेब गुट्टे तसेच स्कॉलरशिप मध्ये इयत्ता पाचवीतून पात्र झाल्याबद्दल कु सुजाता धनराज दहिफळे ही शाळा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा अगोदर शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या गीतावर नृत्य केले. कागदी टोप्या डोक्यावर, हातात रंगीबेरंगी फुगे अशा छान वातावरणात पहिली देणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव भाऊराव राठोड यांनी तसेच शिक्षकवृंदानी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.