सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

पालकांनो, मला शुभेच्छा नको! तुमचा माझ्यावरचा विश्वास हवा आहे!



विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांमध्ये समंजस नातं असणं अत्यंत आवश्यक आहे. पालक आणि शिक्षकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या योजना अंमलात आणणे आवश्यक आहे. यासाठीच पालकांनी शिक्षकांचे कार्य लक्षात घेऊन आपल्या मुलांच्या सुयोग्य शैक्षणिक वाढीसाठी हिच व्यक्ती काही करू शकते असा विश्वास ठेवायला हवा आणि शिक्षकांनी हा विश्वास सार्थ ठरवायला हवा. 


शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे नातं थोडसं धूसर आणि अविश्वसनीय होत आहे याची खंत आहे म्हणूनच मनातलं थोडसं या लेखातून व्यक्त होत आहे. सरकारी शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांच्या कार्याबद्दल सरसकटपणे काही विधाने केली जात आहेत आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मराठी शाळांबद्दल, सरकारी शाळांबद्दल एक अविश्वास, असंतोष निर्माण होत आहे. 


षडयंत्र वगैरे असे काही मोठे मला कळत नाहीत; पण अगदी प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या शिक्षकांकडेही पालक आता संशयित नजरेने पाहत आहेत. त्यातला आदर लुप्त होत आहे. शिक्षकाच्या प्रत्येक कामाला आता तराजूमध्ये मोजलं जात आहे. घड्याळाकडे न पाहता आपल्या कर्तव्याच्या वेळे व्यतिरिक्त वेळ देणाऱ्या, आपल्या कर्तव्यापलीकडेही काम करणाऱ्या शिक्षकांचाही त्यात काही स्वार्थ आहे का? अशा नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. याची खंत अधिक वाटत आहे. 




सगळे शिक्षकच व्यवस्थित काम करत नाहीत हेच आपल्या डोक्यात काही लोक घालण्याचे काम करत असतील तर पालकांनो पुणे जिल्ह्यात नुकतीच 19 वर्ष आदर्श सेवा केलेल्या अरविंद देवकर सरांसारखी आत्महत्या प्रत्येक शिक्षकांनीच करायची का? इतकी पराकोटीची नकारात्मकता कशामुळे पेरली जात आहे? 


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला अनेक घटक कारणीभूत असतात. विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती, त्याची मानसिक अवस्था, शाळेत असणाऱ्या भौतिक सुविधा, शाळेत असणाऱ्या शैक्षणिक सुविधा, शाळेत आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, पालकांची मानसिकता, पालकांचे घरातील शैक्षणिक वातावरण, पालकांची शैक्षणिक स्थिती, पालक देत असलेला वेळ, विद्यार्थ्यांना मिळत असलेली संगत, विद्यार्थ्यांची स्वतःची कष्ट करण्याची तयारी, प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी बौद्धिक कुवत, शारीरिक क्षमता.... अशा कितीतरी गोष्टी ह्या प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनात महत्त्वाच्या असतात.... या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? 


ईश्वर करो की पालकांच्या मनातील हे मळभ दूर होवो, पालकांच्या मनामध्ये असा असंतोष निर्माण करणाऱ्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो आणि पूर्वी इतकेच शिक्षक पालकांचे प्रेमळ नाते तयार होवो, ज्यातून निरागस बालकांचा शैक्षणिक विकास होईल हीच शिक्षक दिनाच्या दिवशी प्रार्थना.



शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

श्री नावकेकर सर : या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे प्रेमळ शिक्षक

 

          शाळेमध्ये असताना मुलांमध्ये रममाण होणारे आणि शाळा नसताना निसर्गाच्या सहवासात हरवून जाणारे अशी ज्यांची ओळख सांगता येईल ते श्री नावकेकर संभाजी भाऊराव हे 31 ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्त झाले. जिल्हा परिषद शाळांमध्ये सहशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द विद्यार्थीप्रिय, सहकारीप्रिय आणि पालकप्रिय अशी होती. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे त्यांच्यासोबत 2005 ते 2012 या कालावधीमध्ये सोबत काम करण्याचा आनंद घेता आला. 
शाळेची गुणवत्ता वाढावी, भौतिक, शैक्षणिक विकास व्हावा यासाठी त्यांची नेहमी धडपड असायची. काही कालावधीसाठी प्रभारी मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले. 


प्रभारी मुख्याध्यापक असताना शाळेच्या मैदानाचा काही भाग त्यांनी उत्तम दर्जाची हराळी खरेदी करून गार्डन म्हणून विकसित केला होता. शाळेचे हे मागील मैदान प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर अतिशय घाणरेडे झालेले असल्याचे जून मध्ये शाळा सुरु होताच लक्षात यायचे. श्री नावकेकर सर आणि टीमने अक्षरश: नांगर फिरवून हे मैदान बागेसाठी योग्य केले होते.  इथे झाडांना पाणी मिळावे म्हणून गावासाठी बंद असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीतून स्वखर्चाने मोटर टाकून शाळेपर्यंत पाईपलाईनची सुविधाही त्यांनी केली होती. हिरवा गालिचा पसरलेला हा मैदानाचा भाग आणि त्यात पाण्याचे छोटासे कारंजे शाळेचा भाग सुशोभित करत होते. 


मुलांना आनंदाने शिकता यावं यासाठी शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न विशेष दखल घेण्याजोगे आहेत. झाडे लावण्यापूर्वी शाळेला साधे कंपाउंड होते म्हणून त्यांनी तारेचे कंपाउंड करून घेतले. गावचे त्याकाळचे उपसरपंच श्री बालाजी प्रभू मुंडे यांना भेटल्यानंतर त्यांनी मजबूत असे कंपाउंडही तयार करून दिले होते. 


कंपाउंडची सुरक्षितता आणि खळाळते पाणी यामुळे शाळेचे मैदान वृक्षांनी नटले होते. लहान मध्यंतरात किंवा मोठ्या मध्यांतरात सरांना वेळ मिळाला की ते फक्त झाडांच्या भोवतीच असायचे.
वर्गातून बाहेर येताना खडूमुळे पांढरे झालेले हात तर वर्गात जाताना झाडांभोवती कुंपण करताना चिखलाने भरलेले हात ते स्वच्छ करताना बहुतेकदा दिसत. 


त्यांनी जेव्हा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार हाती घेतला तेव्हा शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. सरांनी विनंती केल्यानंतर बांधकाम विभागाने एक मोठा पाईप क्रेनच्या साह्याने शाळेत दिला  आणि सार्वजनिक बोअरचे पाणी पाईपद्वारे यात सोडण्यात येऊन पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची ही सोय करण्यासाठी सरांनी व्यक्तिशः खूप मेहनत घेतली. 


जिथे जून मध्ये शाळा उघडल्यानंतर कुलूप तोडलेले असायचे अथवा कधीकधी वर्गात घाण असलेली दिसून यायची त्याच गावचे ग्रामस्थ आता शाळेशी प्रेमाने जोडले गेले होते आणि त्यात श्री नावकेकर सरांची भूमिका मोलाची होती. नावकेकर सर आणि टीम मेहनत घेत असल्याचे पाहून गावकरीही पुढे आले. मदत मिळत गेली, ऑफिसची फरशी बदलण्यात आली, प्रत्येक वर्गामध्ये फॅन बसवण्यात आले, वर्गांची रंगरंगोटी करण्यात आली. आवश्यक तिथे दुरुस्ती केली गेली. शाळेची लाईट फिटिंग होताना सरांचा रात्रीचाही वेळ शाळेत जात होता. 


विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होण्यासाठी विविध स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलने, त्याचबरोबर शैक्षणिक सहलींचे आयोजनही नावकेकर सरांच्या काळात करण्यात आले होते. 


विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांची तळमळ ही अतिशय मोलाची होती म्हणूनच विद्यार्थ्यांशी त्यांचे नाते अतिशय चांगल्या प्रकारचे होते. आजही त्यांचे माजी विद्यार्थी अतिशय आदरणीय त्यांच्याशी बोलतात, त्यांची चौकशी करतात. वर्गात असताना जणू या हृदयीचे त्या हृदयी याप्रमाणे मग्न होऊन अध्यापन करणारे श्री नावकेकर सर आज पुन्हा शाळेत दिसणार नसले तरी निसर्ग शाळेत ते तितकेच रममाण होतील यात शंका नाही. 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर टोकवाडी येथे त्यांचा सेवेचा शेवटचा भाग गेला. या वस्ती शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्यापासून ते गुणवत्ता वाढीसाठीचे त्यांचे प्रयत्न असेच अविरत सुरु होते. शाळा छोटी असूनही स्नेह संमेलन, विविध स्पर्धा, आंतर शालेय स्पर्धेत भाग घेतला जायचा. 


त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे व निरोगी जावो अशी मनःपूर्वक शुभेच्छा त्यांच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या व सहकाऱ्यांच्या वतीने देतो. 
- चंद्रशेखर फुटके, परळी 

















शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

चिमुकले हात सुंदर आकारांना सुबकतेने साकारत होते...

 छोटे, चिमुकले हात आज फोटो फ्रेम, पेन स्टॅण्ड, झुंबर,  पर्स पासून ते सजावटीच्या सुंदर आकारांना सुबकतेने साकारत होते...

वह्या, पेन, पुस्तकांऐवजी आज विद्यार्थ्यांच्या हाती कात्री, रंगीत कागद आणि विविध साहित्य दिसत होते.....
शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दर पंधरा दिवसाला होणाऱ्या स्पर्धेत आज पेपर क्राफ्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.
 
कला शिक्षक हे पदच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नसते. येथील नियमित शिक्षकच क्रीडा शिक्षक, कला शिक्षक, संगीत शिक्षक आणि सर्व विषयांचे अध्यापन करत शालेय पोषण आहारापासून ते कारकूनसह शाळेतल्या सर्व जबाबदाऱ्यांचे काम करत असतात; पण कारणे न सांगता विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी विविध उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत घेतले जातात. 

विद्यार्थ्यांच्या मदतीने हे उपक्रम होत असल्याने त्यातला उत्साह कायम आहे. पेपर क्राफ्टच्या आजच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी निसर्गातील अनेक सुंदर प्रसंग, त्याचबरोबर नित्य उपयोगी वस्तू कागदाच्या मदतीने सुंदररीतीने तयार केल्या. विद्यार्थ्यांची कल्पक बुद्धी या निमित्ताने दिसून आली. 

दर पंधरा दिवसाला होणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्गातून तीन बक्षीस दिले जातात; परंतु आजच्या स्पर्धेमध्ये बक्षिसे देताना परीक्षक शिक्षकांनाही अधिक संख्येमध्ये बक्षीस हे द्यावी लागली हेच या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणावे लागेल. 
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री चि कन्हैया गुट्टे, उपमुख्यमंत्री कु राधा गुट्टे यासह कलामंत्री कु समृद्धी गुट्टे यांनी मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री दत्ताराव मुंडे, सरोजकुमार तरुडे, राजेश्वर स्वामी, चंद्रशेखर फुटके, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट यांनी परिश्रम घेतले. 



बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.  


विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून दुसऱ्या व चौथ्या शनिवारी शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. 
शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत. 









 

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

कासारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा












*विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कासारवाडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

ग्रामपंचायत कासारवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय कासारवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी सरपंच सौ उर्मिला बंडू गुट्टे तसेच उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा सर्व गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी घेतली. बालविवाहास कोणीही प्रोत्साहन देणार नाही अथवा मदत करणार नाही असे गावकऱ्यांनी आश्वासन दिले. 

त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये विविध महात्म्यांची तसेच स्वातंत्र्यासाठी मेहनत घेणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची भूमिका घेणारे विद्यार्थी शोभून दिसत होते. ढोल, ताशा, हलगी यांच्या गजरामध्ये विद्यार्थी बालविवाहाच्या आणि भारत मातेच्या घोषणा देत होते. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांसह गावातील ग्रामस्थांचाही मोठा सहभाग होता. विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थ असणे हे फारच कमी गावात असते कासारवाडीत मात्र देशभक्ती जणू प्रत्येक ग्रामस्थाच्या रक्तातच आहे. ध्वजारोहणास आणि प्रभात फेरी त्यामुळेच मोठी शोभा येते. 

प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाचा सन्मान तसेच पोलीस खात्यात सेवा करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला. ग्रामसेवक श्री नागरगोजे यांनी मेरी माटी मेरी देश या कार्यक्रमाची माहिती देऊन प्रत्येक गावातून कलशाद्वारे राजधानी दिल्ली येथे माती दिली जाणार असल्याचे सांगितले व गावकऱ्यांनी प्रेमभावे कलशात माती भरण्याचे आवाहन केले त्यानुसार ग्रामस्थांनी कलशात माती भरली व राष्ट्रभावना व्यक्त केली. 

अंगणवाडी ते इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये वक्तृत्व करून गावकऱ्यांची मने जिंकली. राष्ट्रभक्तीपर गीतांचे गायन तसेच राष्ट्रभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्य केले. 

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनेक शेरोशायरींची उत्कृष्टपणे गुंफण करत बहारदारपणे श्रीमती प्रिया काळे यांनी केले. संचलनाबद्दल त्यांचा तसेच नवीन शिक्षक श्री स्वामी व श्री मुंडे यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

ग्रामपंचायत कासारवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना खाऊ वाटप करण्यात आला. 

गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे यांच्यासह शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते, ग्रामसेवक श्री नागरगोजे, पोलीस पाटील श्री बाबुराव गुट्टे यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री राठोड यांच्यासह शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.